बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी बीडमध्ये तळ ठोकला असून तेथील अनेक अनियमित कामांसंदर्भात आवाज उठवला आहे.
नागपूर: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी बीडमध्ये तळ ठोकला असून तेथील अनेक अनियमित कामांसंदर्भात आवाज उठवला आहे. बीडमधील शासकीय कार्यालयात अनेक वरिष्ठ पदावर परळीतील वंजारी समाजातील लोक असल्याचा दावा त्यांनी काही पुराव्यांआधारे केला होता. यावरून आता अंजली दमानिया यांना वंजारी समाजाकडून रोष पत्कारावा लागत आहे.
पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संतोष देशमुख प्रकरणाच्या हत्येच्या निषेधार्थ बीड, परभणी आणि पुण्यात मोर्चा निघाला आहे. तर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते माझा छळ करत असल्याचा आरोप केला. याबाबत विचारले असता मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहेत. काहीही झाले तरी या प्रकरणात कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही. या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी आणि हफ्ते वसुली करतात, असा सगळ्यांवर आम्ही जरब बसवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे, या संदर्भात योग्य कारवाई सुरु आहे. अंजली दमानिया यांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यावी, पोलीस यावर निश्चित कारवाई करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
भाजप वगळता सर्व पक्षात परिवारवाद
नागपूरमध्ये रविवारी शहर भाजपतर्फे आयोजित पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते बुथपातळीवर उत्तमप्रकारे नोंदणी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. हा धागा पकडून फडणवीस यांनी कार्यकर्ते, संघटना आणि सत्ता याची सांगड कशी घातली जाते व यात कार्यकर्ता हा किती महत्वाचा असतो हे सांगितले. फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा देशातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. ११ कोटी सदस्यांची नोंदणी झाली आहे. बाकी सर्व पक्षात परिवारवाद आहे.