मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री मिळालं नसल्यामुळे नाराजी बोलून दाखवली होती.रायगडच्या पाकलमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस चालू आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये धूसफूस चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केल्यानंतर काही नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना (शिंदे) नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं नसल्यामुळे त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले इच्छुक होते. मात्र, रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. मात्र, रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष चालू आहे. रायगडमधील शिवसेनेचे इतर आमदारही गोगावले यांच्याबरोबर आहेत.
“नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी काम केलं नाही, रायगडमधील शिवसेनेच्या (शिंदे) तिन्ही विद्यमान आमदारांना पाडण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. तसेच गोगावले म्हणाले, “पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेण्यासही मी तयार आहे”. यावर आता सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “माझी देखील कोणत्याही मंदिरात जायची तयारी आहे. पालीचा बल्लाळेश्वर, हरिहरेश्वर, अलिबागच्या कनकेश्वर मंदिरात जायची माझी तयारी आहे. कारण आम्ही विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे महायुतीचं काम केलं आहे. अलिबागमध्ये महेंद्र दळवींसाठी, महाडमध्ये भरत गोगावले यांच्यासाठी काम केलं आहे. कारण लोकसभा निवडणुकीत या मंडळींनी प्रामाणिक काम केलं होतं. तसंच आम्ही विधानसभेला काम केलं. आम्ही आमची पूर्ण ताकद लावली होती”.