महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय मागणी केली आहे?
बीडच्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चर्चेत आहे. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसंच या प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा संशय ज्याच्यावर आहे तो वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे. सुप्रिया सुळे यांनीही अशीच मागणी केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“बीडच्या प्रकरणात आम्ही राजकारण आणलेलं नाही, आणणार नाही. सुरेश धस यांनी बीडच्या बदनामीचं राजकारण केलं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की ही बीडची बदनामी नाही. आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. वाल्मिक कराडची कृती राक्षसी आहे. माध्यमांनी हे दाखवलं आहे गेल्या काही दिवसांपासून. सुरेश धस, बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया सगळ्यांनीच या गोष्टी सांगितल्या. राज्यातल्या माध्यमांनी हे प्रकरण ३१ दिवस लावून धरलं आहे. कारण माध्यमांनी नैतिक जबाबदारी म्हणून हे सगळं समोर आणलं. आम्ही वाल्मिक कराड नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इथे खून, बलात्कार, अन्याय, अत्याचार असं सगळं होत असताना गप्प बसायचं का? ” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.